Saturday 8 March 2014

गंध माझा विसरू नकोस.....!

प्रिय....?
माझ्यासाठी तू सदैव प्रियच होतास.
कसा आहेस तू...? माझे हे पत्र पाहून अतिशय अवाक् झाला असशील ना...?
अचानक, अनपेक्षितपणे इतक्या वर्षाने माझे असे पत्र आलेले पाहून तुला फारच आश्चर्य वाटले असेल ना....? की तू माझ्या पत्राची वाटच पाहत होतास?
किती वर्षे झाली रे....? १६...? नाही रे तब्बल १८ वर्षे...?

१८ वर्षांनी तुला पत्र लिहिताना माझे हात थरथरताहेत, मनात चलबिचल होतेय आणि खूप खूप रडू येतेय. काय काय आणि किती किती गोष्टी तुला सांगायच्या राहिल्यात. पण एकदा ठरवलं की आता गप्प नाही बसायचे.... मी नाहीच सांगितले तर तुला कळणारच नाही, म्हणून हा खटाटोप.

आपल्या कॉलेजचे दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात सोनेरी दिवस होते. नंतर काही त्या सुवर्णफुलांचा सडा माझ्या अंतरात पडलाच नाही. हो, कधीच नाही... कारण तो सडा मीच माझ्या अंगणात पडू देणार नव्हती. मीच मुद्दामहून तो पारिजात माझ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय माझा स्वतःचा नव्हता. मी माझ्या लग्नाच्या दिवशीच स्वतःला मनापासून अग्नी दिला व आयुष्याची राख करून घेण्यास तयार झाली. अंतरपाटा पलीकडे कुठून तरी तू येशील असं वाटत होतं....

भटजीच्या कर्कश्श्य आवाजाबरोबर मी होरपळले जात होते, पडणा-या अक्षता अंग अंगाला बोचत होत्या, मी सुन्न उभी होती, हातातून हार गळून पडेल असं वाटत होते आणि नेमकं तेव्हाच आंतरपाट दूर झाला.

समोर तू नव्हतास,
समोर तू नव्हतास...?
हा कोण आहे..? माझ्या हाताला आईच्या हाताचा स्पर्श झाला आणि मी हार त्या अनोळखी व्यक्तीच्या गळ्यात घातला. मग त्याने हार गळ्यात घातला. आणि मी लग्नमंडपातच कोसळले. मग मात्र कळलेच नाही काय होतेय ते..... सगळे जण येत गेले आणि शुभेच्छा देत गेले.

माझ्या डोळ्यांसमोर तर तुझे नी माझे दिवस तरळत होते. कॉलेजच्या अन्युअल फंक्शनला आपण दोघांनी केलेला तो कपल डान्स मला आठवू लागला. आणि मग स्टेजच्या मागे एकत्र बसून चांदणं बघत घालवलेला तो वेळ.... तेथेच तू मला प्रपोज केलं होतंस.....

मध्येच कोणाच्या तरी पाया पडायला वाकावे लागायचे, डान्समध्ये घेतलेल्या गीराकीप्रमाणे क्षणभर वाटायचे मग पुन्हा तुझा चेहरा समोर यायचा.
चांदण्यातून फिरताना मग तू हळुवार माझा हात हातात घेतला होतास आणि स्टेजवर ‘पहिला पहिला प्यार है’ चे सूर ऐकू येऊ लागले. तुझ्यासाठी अनुभवलेलं ते पहिलं वहिलं प्रेम....? आणि मग दोन क्षण तुझ्या डोळ्यांत पाहून वाटलेला विश्वास....

नंतर प्रक्टिकलच्या वेळेस ते चंबूतून एकमेकांकडे पाहणं. त्या चंबूतून तुझं वाकडं नाक सरळ दिसायचं... आणि मग मला गालातल्या गालात हसू यायचं. रात्र रात्रभर बसून तुझ्या जर्नल पुर्ण करता करता नाकी नऊ आले होते माझ्या. आणि तू फक्त समोर बसून बघत रहायचास मला. तेवढा वेळ मिळायचा तुला पण जर्नल मात्र मीच पूर्ण करायच्या तुझ्या, दुष्टा,

हा प्रवास डोळ्यांसमोरून सरकत असताना हळूच दादाने जवळ घेतलं आणि हमशाहमशी रडत कानात कुजबुजला, आता शांत हो, मी आहे तुझ्यासोबत, आईने माहेर तोडलं असंलं तरी हक्काने ये मी समाजावेन आईला

मग भानावर आले आणि इथे तिथे पाहिलं तर मागे मावशीच्या कुशीत रडणारी ही माझी आई आहे.... जी काही दिवसांपूर्वी माझा जीव घ्यायला निघालेली आणि आज मी दूर जातेय म्हणून रडतेय....
खरं सांगते तुला, त्या क्षणीही तू कुठूनतरी यावंस आणि त्या अनोळखी माणसाच्या जागी येऊन बसावसं असंच मला वाटत होते. मग दादाने गाडीत बसवलं. मी आता वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःला सावरले. नुकत्याच  झालेल्या माझ्या घरी आले तेव्हा तिथली माणसं फारच छान वाटली. फार प्रेमाने वागवत होती. नवलाईचे माझे दिवस... मी त्या प्रेमाने हुरळून गेले. माझ्या सासूबाई खूपच प्रेमळ होत्या. त्यांनी मला फार प्रेमाने वागवलं. तुला विसरता येत नव्हतं आणि सासूबाई खूप प्रेम करू लागल्या होत्या. पाच पर्तावनाचा कार्यक्रम दादाने फारच जल्लोषात पार पाडला. त्यादिवशी मी आईला भेटायला गेले तर तिने मला जवळही घेतले नाही. डोळे वटारून मला म्हणाली, तू माहेरी कधीही ये पण तुझी आई तुझ्यापासून तुटली आहे हे लक्षात घे. काळजात काहीतरी रुतल्यासारखे झाले. लहानपणी हातून काही चूक घडली की आई अशीच डोळे वटारायची आणि तिच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची. मग मी रात्रभर माझ्या खोलीच्या खिडकीतून तो पिंपळ बघत रहायची. आणि तू आयुष्यात आल्यानंतर तर तुझ्याशी भांडल्यावरही मी तो पिंपळ बघण्यात गुंग व्हायचे.

तुला आठवतात का रे आपली भांडणे? फार क्वचित पण फार मोठी झालेली. आणि ते भांडण तर फारच मोठे झाले होते. मला पावसात वाट पाहायला लावून तू चक्क एकटा भिजत भिजत गेलेलास. आणि तब्बल ४ तासाने परत आलास. हातात फुलं घेऊन. मला नकोच होती तुझी ती फुलं. मी न घेताच तशीच घरी आले होते. आणि मग रात्री पिंपळ पाहताना त्या पिंपळाखाली मी तुला पाहिले. कुडकुडत, तीच फुलं हातात घेऊन, माझी खिडकीत येण्याची वाट पाहत उभा होतास. मला पहिल्यांदा तो भास वाटला. पण मग तुला पाहून मला जो धक्का बसला होता तो माझा मलाच माहित. आता तुला घरात तरी कशी घेऊ? आई, दादा सगळेच घरात होते. तू कान पकडून सॉरी म्हणू लागलास, मला ती फुलं देण्यासाठी तू असा चिंब भिजत उभा होतास. पण आता त्याचा काय उपयोग होता. मग मी माझ्या खिडकीतून टॉवेल आणि दादाच्या कपाटातले एक टी -शर्ट तुझ्याकडे भिरकावले. वेऽऽऽडा कुठला.

तो पिंपळ आजही मला तितकाच हवाहवासा वाटतो रे. पण काय करू गेली १८ वर्षे मी तो पाहिलेलाच नाही. जसे आईला पाहिलेले नाही. दादाने मला वारंवार त्या घरात बोलावूनही मी माझ्या माहेरी गेलीच नाही. आईने माहेर तुटले असे सांगितले आणि मी ते मुद्दामहून तोडून घेतले.

काय झालं असतं जर आईने आपल्या दोघांच्या लग्नाला होकार दिला असता. काय फरक पडला असता जर आपले लग्न तू डॉक्टर झाल्यावर ५ वर्षांनी झाले असते. जितकी श्रीमंत सोयरिक आईला हवी होती तितका श्रीमंत तू झाला असतास. तू ही तितकंच कमावलं असतंस रे... माझा फार विश्वास होता तुझ्यावर, तुझी दूरदृष्टी, तुझी ध्येय, तुझी हुशारी याची चर्चा आपल्या कॉलेजमध्ये होतीच. केवळ मलाच नाही तर आपल्या प्राचार्यांनाही तुझ्या कर्तबगारीवर फार विश्वास होता. डॉक्टर बनण्याचे तुझे ध्येय मला फार अचंबित करायचे. पण आईला आपल्या प्रेमाविषयी कळले आणि सगळंच विस्कटून गेलं.

मला तुझी व्हायचं होतं. मला आयुष्यात फक्त तूच हवा होतास. माझं सर्वस्व केवळ तुलाच द्यायचं होतं. पण आईपुढे काहीच चालले नाही  माझे, नाही तुझे, ना तुझ्या आई वडिलांचे, ना माझ्या दादाचे. कारण मीच मुळात कमकुवत बनले, तिने लहानपणापासून केलेल्या कष्टांची ढाल बनवली व मी हताश झाले. तिचे ते वटारलेले डोळे आठवले की आजही अंगावर काटा येतो. कारण त्या डोळ्यांची मला लहान असल्यापासून भीती होती. एका रात्री दादा घरात नव्हता. आईने मला सांगितले की तिने माझे लग्न ठरवले आहे. टेबलावर फोटो आहे तो पाहून घे मी सर्वस्व एकवटून आईला म्हणाले आई मला फक्त त्याच्याशीच लग्न करायचे आहे. मी नाही पाहणार तो फोटो मी नाही लग्न करणार त्या मुलाशी, माझं शिक्षणही तू पूर्ण होऊ देणार नाहीस का? आई निवांतपणे उठली आणि जाऊन अंगावर रॉकेल ओतू लागली. मी धावत गेले.

आईऽऽऽ, अग नको करूस असं. मला समजून घे. प्लीज एक खाडकन चपराक बसली कानशिलात. आईचे तेच डोळे, रक्त साकळलेले आणि मी शांत झाले. तोंडातून यंत्रवत शब्द बाहेर फेकले गेले आई, तू सांगशील तेच आणि तसेच होईल पण नको, तू जीव नको देऊस.

त्याच रात्री मी तुला फोन लावला. मी आता तुझ्याशी लग्न करणार नाही, माझ्या आईने माझ्यासाठी खूप चांगला मुलगा शोधला आहे. मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. मला फोन नको करूस आणि काहीच संबंध ठेवू नकोस माझ्या बोलण्यामागचा तो अस्पष्ट हुंदका तू ओळखलास आणि म्हणालास मला माहित आहे की तू हा निर्णय का घेतला आहेस ते. तुझ्यावर मी काहीच जबरदस्ती करणार नाही. पण तुझ्या सप्तपदी होईपर्यंत मला कधीही बोलव मी धावतच तुझ्याकडे येईन तुला तिथून घेऊन जाईन. सुखी राहा. तेच शब्द आजही आठवून मी जगते आहे. हेच शब्द माझ्या जगण्याचा आधार आहेत.
आणि मग सुरु झाले माझ्या आयुष्याचे एक अनाकलनीय पर्व, काळोख्या रात्री एखाद्या ओसाड वाटेचा शेवट मिळू नये तसे.

पाचपर्तावनानंतर मी कधीच माहेरी गेली नाही. त्या रात्री माझ्या आयुष्यात पूर्ण बदल होणार होता. ज्या रात्रीची मी केवळ आणि केवळ तुझ्याच बरोबर कल्पना करू शकत होते. ती रात्र मला त्या अनोळखी ब्याक्तीबरोबर घालवावी लागणार होती. सासूबाईंनी अगदी आईसारखे समजावून सांगितले. हि रात्र मुलीच्या आयुष्यातली किती मोलाची रात्र असते. त्यांच्या त्या आपुलकीने वाटले की खरंच इतकी का प्रेमळ आहे हि बाई. का हि मला इतका जीव लागते. मग मनातल्या मनात त्या माणसाला ओळखीचे करायचे ठरवले. केवळ त्या बाईसाठी..... खूप उशिरा रात्री तो आला.... मनात खूप भीती वाटली. पण मान वर करून बघितलं नाही त्याला. तो बाजूला येऊन बसला म्हणाला मी उद्या परत अमेरिकेला जाणार आहे. मला माफ कर पण मी यापुढे कधीच तुझा होणार नाही. मला माझ्या आईने सक्ती केली होती आणि तुझ्या आईनेही लग्नाची घाई केली म्हणून मी लग्न केले. पण खरंतर माझ्या आईला हे माहित नाही की माझे अमेरिकेत आधीच लग्न झालेले आहे. तिच्या आजारपणामुळे मी तिला दुखवू शकलो नाही. मी तुझी आणि आईची सर्व जबाबदारी पेलीन आणि जर तुला हवं असेल तर आपलं मुलही होईल. पण माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नकोस. निर्णय तुझा आहे. तुला डिवोर्स हवा असेल तर तसं नाहीतर तू इथे राहू शकतेस. माझं काहीच म्हणणं नाही.

खरं सांगते तुला, तेव्हा मला फार आनंद झाला होता की आज रात्रीनंतर हा मुलगा मला भेटणार नाही. मग जाणीव झाली की हे वादळ किती मोठं आहे. एकदम हताश झाल्यासारखं वाटलं. मी त्याला म्हणाले, तू  निश्चिंत होऊन अमेरिकेला जा. माझी काहीच तक्रार नाही. तो पाठ फिरवून झोपून गेला. मी त्या आलिशान बंगल्याच्या खिडकीत उभी राहिले. इथे कोणताही पिंपळ नव्हता मग तू कसा असशील. पण
व-याची झुळूक इथे येते-जाते. बस्स! पिंपळाला जसे डोळ्यांत भरून घेतले होते त्याचप्रमाणे ती झुळूक मी ऊरात भरून घेते. हिच्यासारखे आपल्यालाही वाहता यावं असं वाटते मला.

त्याच माझ्या वेड्या कल्पना आजही मी करते. तुझ्याकडे करायची तशीच..... पावसाच्या सरीवर लटकणे, ढगात आंबा शोधणे, पाटीवरची पेन्सिल चावणे, नवीन पुस्तकाचा वास घेणे, पायाच्या अंगठ्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करणे, तापलेल्या तव्यावर मुद्दामहून पाणी शिंपडणे आणि....? आणि बरेच काहीतरी होते ना रे? मला तर इतकेच आठवते आहे.

माझा नवरा जसा बोलला अगदी तसाच तो निघूनही गेला. सहज. मग उरलो फक्त सासूबाई आणि मी. खरंतर मी आणि तू. सासुबाईंनी खूप जीव लावला. खूप प्रेम दिलं. तुला मी तोडलं, आईने मला तोडलं, मी माहेर तोडलं, नव-याने मला तोडलं पण मला सासूबाईंनी जवळ केले. अगदी त्यांच्या मुलासारखे. तो दर महिन्याला पैसे पाठवत गेला आणि दर वर्षाला एकदा येत गेला. त्याने फक्त एकदाच विचारले. आपलं मुल तुला हवं आहे का? मी म्हणाले, नकोच जसं चाललंय तसंच चालू दे.
अगं, पण आई फार मागे लागली आहे. त्याने सांगितले.
मी माझ्यात काहीतरी कमी आहे असं सांगेन त्यांना. मी घेईन सांभाळून त्यांना. तू मात्र त्यांच्यासाठी एकदा तरी येत जा. मी सांगितले.

मी सांगितले कारण मला तुझे उष्ण श्वास विसरायचे नव्हते. आपण एकत्र घालवलेले ते अविस्मरणीय क्षण, तना-मनावर कोरले गेलेले, सीमोल्लंघन होण्याआधी सावरलेले. ती गुंफण, ती शृंखला मला विस्कटायची नव्हती. तुझे बाहु भरून मला सावरणे आणि त्यात माझे विरघळणे आठवते का रे तुला आजही. मला आठवते.... प्रत्येक क्षणी आठवते. आज अठरा वर्षांनतरही त्या खुणा कणभरही धूसर झालेल्या नाहीत. त्या वर्षीचा माझा वाढदिवस एकमेकांसोबत साजरा करताना एकमेकांना अनुभवले होते. आणि माझा वाढदिवस सासूबाई दरवर्षी न विसरता साजरा करतात.

त्या कधीच विसरल्या नाहीत माझा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, माझा आवडता रंग, माझे आवडते खाणे, मला आवडणारे ठिकाण, माझे आवडते पुस्तक, माझं आवडत गाणं, आणि बाकी सर्व आवडणारं. जे जे काही त्या मला देऊ शकल्या ते ते त्यांनी मला दिलं. अगदी न मागता. त्यांना जर तुझ्याविषयी माहित असते तर त्यांनी तुलाही माझ्या पुढ्यात आणून उभं केलं असतं.

असं म्हणतात की, सगळे दरवाजे बंद झाल्यावर नियतीचा दरवाजा उघडतो. तुझ्यानंतर माझ्या सासूबाई नियती बनून माझ्या आयुष्यात आल्या आणि माझे आयुष्य त्यांनी स्वतःच्या सुगंधाने दरवळून टाकले. माल आधार दिला, प्रेम दिलं, कधी माहेरी जावं असं वाटलंही नाही मला. दादा मात्र न चुकता येत गेला. आईने घरी बोलावलं आहे असं नेहमी सांगत होता. पण मी गेले नाही. मी सासूबाईंनाच आई म्हणू लागले.
गेली अठरा वर्षे मी तुझ्या आठवणींसोबत व त्यांच्यासोबत जगात होती. पण आता केवळ आणि केवळ तुझ्या आठवणी उरल्या आहेत. कारण माझ्या सासूबाई बारा दिवसांपूर्वी वरल्या. मला सोडून गेल्या. माझे आयुष्य पुन्हा एकदा भयाण करून गेल्या. त्या गेल्या तेव्हा आतून काहीतरी उचकटल्यासारखे वाटले. आईने माहेर तोडल्यावरही वाटलं नव्हतं तितकं पोरकं वाटलं. एका वाळवंटात एकट पडल्यासारखं.....
जेमतेम आठवडाभर त्या आजारी होत्या. शेवटच्या क्षणी मला म्हणाल्या की आयुष्यभर तू माझ्या मुलाकडून मिळालेली जी सल भोगते आहेस ती मला माहीत आहे. पण तुझी क्षमा मागण्याची हिम्मत नव्हती माझ्यात. भीती वाटत होती की तू मला सोडून जाशील. यासाठीच कधीच तुला हे सांगितले नाही की मला सर्व माहित आहे. माझ्या मुलाला माफ केलेस तसेच मलाही माफ कर आणि मुक्त कर माझा हात हातात घट्ट पकडून त्यांनी प्राण सोडले. म्हटलं हे कसलं ओझं त्यांनी इतकी वर्ष बाळगले? आणि का? मी तर स्वतःच पोरकी होते. मी ह्यांना सोडून कुठे जाणार होते.

नवरा म्हणाला की थोडे दिवस माझ्याकडे चल, आई आणि दादाही म्हणाले की आमच्याकडे चल. पण मी नाही गेले. कारण मला आता कुठेच जायचे नाही. तू नेहमी म्हणायचास वादळ आलं तर ताट उभं राहू नये. आपण लवचिक रहावे. तर फक्त हेलपाटू पण ताट राहिलो तर कालांतराने तुटून जाऊ मी अगदी तसेच केले. अगदी तसेच. मी प्रत्येक वादळासमोर लवचिकपणे हेलापाटले. पण आता नाही रे आता मी नाही अजून या वादळात तग धरू शकत. माझा सायलीचा वेल, माझा आधार; माझ्या सासूबाईच आता राहिल्या नाहीत. मी काय करू.

त्यादिवशी टी.व्ही. चॅनेलवर तुझी मुलाखत पहिली होती. खूप वेळ अगदी टी.व्ही. जवळ बसलेले. तुला निरखत, तुझ्या जवळ.... आणि मग तिथूनच तुझ्या िक्लनिकचा पत्ता घेतला. बरेच दिवस होता माझ्याकडे पण अशा कारणासाठी तुला पत्र लिहावे लागेल असं वाटले नव्हतं. तू मोठा डॉक्टर झालं आहेस. यात काही वादच नव्हता. तो तर तू होणारच होतास. तुझे यश पाहून वाटले अजून काय हवंय आयुष्यात.

पण पुरे आता! खूप झालं जगणं, श्वास घेणं, दिवस ढकलणं. सासूबाईंनंतर आता फारच कठीण होईल. त्यातही तुझ्या आठवणी का कमी होत्या जगण्यासाठी. हे पत्र तुला मिळेपर्यंत मी स्वतःला संपवलेलं असेन. मला फार वाटायचे की आपले लग्न झाले असते तर तुझ्याआधी मी जावे. लग्न नाही झालं म्हणून काय हरकत आहे पण मी तुझ्या आधी जाते आहे. तुझ्या अधिक जवळ येण्यासाठीच.

जेव्हा कधी वा-याची झुळूक तुझ्यावरून जाईल तेव्हा तेव्हा माझा गंध ओळखण्याचा प्रयत्न कर. मी तिथेच असेन तुझ्यासोबत.

जी सदैव तुझ्यासाठी झुरली
--------                                     

Friday 29 November 2013

भारतीय नृत्याचे आंतरराष्ट्रीय फ्युजन- अदिती भागवत

पूर्वप्रसिद्धी: चित्रलेखा, प्रियदर्शिनी (२६ ऑगस्ट २०१३)
         माझी सहेली (दिवाळी २०१३)

एका रंगलेल्या संगीत मैफलीत तीन विदेशी वादक सतार, गीटारसारखी वाटणारी पण वेगळी अशी काही वाद्य घेऊन कार्यक्रम सुरु करण्याच्या तयारीत आहेत. इतक्यात रीत्रीची गडद निळाई पांघरल्याप्रमाणे निळाशार गाऊन घालून आम्बोड्यात निळे फुल खोउन एक भारतीय तरुणी मंचावर अवतरते. हि नृत्य सादर करणार आहे का.... नाही... ही तर एक बाजूला जाऊन उभी आहे. मैफल सुरु होते आणि अजूनही हि तरुणी नेमकी काय करणार आहे हे उमगलेलं नसतानाच ती आपला गाऊन वर धरते व वादकांच्या तालावर घुंगरू बांधलेल्या पायाचा एक ठेका घेते आणि त्याबरोबर एक विलक्षण अनुभवाची प्रचीती येते. अरे... ही तर आपली अदिती भागवत आहे.
संगीत क्षेत्रातील वनबीट या आंतरराष्ट्रीय संस्थेचे हे सारे वादक आहेत. अमेरिकेच्या राज्यस्तरीय सांकृतिक विभागाने व न्यूयॉर्कमधील ‘बँग ओन अ कॅन’ या प्रसिद्ध संस्थेचीच असलेली एक उपशाखा ‘फाउड साउंड नेशन’ या संस्थेने मिळून ‘वन बीट’ नावाचा एक फेलोशिप उपक्रम आखला आहे. जगभरातील वेगवेगळ्या माध्यमातून संगीत क्षेत्रात निराळे व अनोखे प्रयोग करणारे व आपले योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी ही फेलोशिप आहे. पण अदिती तर कत्थक नृत्यांगना आहे आणि ती चक्क संगीत विषयातील फेलोशिपसाठी इथे काय करतेय, असा प्रश्न कोणालाही पडेल. अदिती केवळ कथ्थक नृत्यांगना म्हणून ओळखली जात नाही तर ती अभिनयही करते. निवेदन करते, ती ओडिसी नृत्यप्रकार ही शिकली आहे. शिवाय गेले १० ते १२ वर्ष तिने कथ्थकसोबत इतर नृत्यप्रकारातील मेळ साधून काही फ्युजन प्रयोगही केले आहेत. अशाच एक प्रयोगापैकी तीचा एक प्रयोग तिने वनबीट या फेलोशिपसाठी केला आहे. ‘फुट पर्केशनीस्ट’ म्हणून तिने नृत्यांगना असूनही एक संगीतकार म्हणून २०१२ या पहिल्याच वर्षी आंतरराष्ट्रीय फेलोशिप संपादित केली.
फुट पर्केशनीस्ट; पायांच्या आघाताने नादमय संगीत निर्माण करणे. अदितीने आपल्या कथ्थक निपुणतेचा पाया घेऊन कथ्थकमधील पदन्यास किंवा तत्त्कार या शैलीचा वापर करत संगीत तयार केले. “वनबीटसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही साधी सोप्पी नव्हती तर त्यातही अनेक आव्हान होती. याची प्रवेश प्रक्रिया एकूण ४ ते ५ महिन्यांची होती. जानेवारी-फेब्रुवारी २०१२ला सुरु झाली होती. त्यांची एक प्रश्नावली असते त्यात केवळ स्वतःची माहिती देणं अपेक्षित नसतेच तर कलाकार म्हणून कला किंवा त्याची सांगड याबद्दल तुमचा दृष्टीकोन काय आहे हे त्यांना अपेक्षित असते. म्हणजे तुम्ही काय पद्धतीने काम केले आहे, तुमच्या कामातून सामाजिक बांधिलकी जपली आहेत का, आजच्या पिढीचे कलाकार म्हणून तंत्रज्ञानाचा तुमच्या कलेत कसा वापर करता? असे अनेक प्रश्न विचारले जातात. शिवाय तुमचे फोटो, तुमचे विडीओ त्यांना पाठवावे लागतात. यात माझी निवड झाली व जूनमध्ये मला त्यांचा फोन आला. हि प्रक्रिया काही फार सोप्पी नव्हतीच. पण या सगळ्याची मी पूर्वतयारी केली होती. ज्यामुळे माझे काम त्यांना आवडले व एकूण ४० देशांमधून ३२ कलाकार निवडले गेले. त्यांनतर निवडलेल्या एकूण कलाकारांपैकी तुम्हाला कोणत्या कलाकारांबरोबर काम करायला आवडेल हे त्यांनी विचारले होते. त्या सर्वांची यादी त्यांनी पाठवली होती. मग त्या कलाकारांचा कामाचा आढावा मी जवळ-जवळ आठवडाभर घेत होते आणि मग पुन्हा एक अर्ज द्यायचा होता. भारताचे प्रतिनिधित्व मी केले व सप्टेंबर-ओक्टोबर २०१२ ला हि फेलोशिप मला मिळाली.” अदिती अभिमानाने सांगत होती.
अदितीने निवडताना काही तंतुवाद्य वादाकांसोबत काम करायचे ठरवले पण प्रत्यक्ष जेव्हा सर्व कलाकारांची भेट झाली तेव्हा मात्र प्रत्येकासोबत तीला काम करायला मिळाले. क्वॉट्रो (चार तारा असलेली गिटार), इराकमधील एक संतूर, कोरिओमधील गयागुम, अमेरिकेतील बेन्जो, टांझियामधील घुमरी हे वाद्य, असे अनेक देशातील वेगवेगळी तंतुवाद्य होती. त्यांच्यासोबत अदितीने पदन्यास व तत्त्कार यांची साथ घेऊन काम केले आणि घुंगरू हे तिने तिचे वाद्य म्हणून वापरले. अनेकदा तबल्यासोबत साथ-सांगत म्हणून पदन्यास किंवा तत्कार केले जातात पण घुंगरुच वाद्य म्हणून वापरण्याची अदितीची ही संकल्पना खरोखरच उल्लेखनीय आहे.
हि संकल्पना अदितीला तिच्याच कामातून सुचली होती. तिने भारतात तिच्या कार्यक्रमांतून पदन्यास व तत्त्कारमधून अनेक फ्युजन प्रयोग केले होते. त्यामुळे हे काम पुढे गेले पाहिजे या उद्देशाने तिने या फेलोशिपसाठी अर्ज केला होता व तिथे तिला असे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी अक्षरशः अनेक पटींनी वाव मिळाला होता.
अदितीच्या आईने तिला अगदी चौथ्या वर्षीच नृत्य शिकायला पाठवले. जयपूर घराण्यातील पद्मश्री रोषन कुमारीजी यांच्याकडे तिने प्रशिक्षण घेतले. अदितीने चौदाव्या वर्षीच पहिला कार्यक्रम दिला होता. कथ्थकमधूनच तिने गांधर्व महाविद्यालयातून एम.ए. पूर्ण केले. शैक्षणिक विषयात तिने सायकोलोजी विषय घेऊन एम.ए. केले आहे. लयकारी व तालाचे शिक्षण घेतले. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे या अदितीच्या ओडिसी नृत्याच्या गुरु आहेत. २००३ मध्ये आकृती या चमुसोबत पहिल्यांदा तिने जॅझ लावणी आणि जॅझ कथ्थकचे कार्क्रम केले. त्यानंतर अनेक दिग्गजांबरोबर कार्यक्रम करण्याचे तिचे पर्व सुरु झाले. त्यानंतर तिने परदेशी हि अनेक कार्यक्रम केले. सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला तो राजभावनमध्ये. त्यासोबतच तिने मालिका, चित्रपट व सुत्रसंचालनही केले. एका पेक्षा एक या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची ती परीक्षक होती. गेल्याच वर्षी तिने ‘म्योहो’ नावाचा एक प्रायोगिक चित्रपटही केला आहे व त्यात तिने नृत्यांगानेचीच भूमिका केली आहे व स्वतःचे नृत्य स्वतःच दिग्दर्शित केले आहे. मधुर भांडारकरच्या ट्राफिक सिग्नल या सिनेमातील तिने केलेलले आयटम सॉंगमुळे तिला कारकिर्दीतील धडा मिळाला होता. अदिती सांगत होती, “मला ते काम थोडं आव्हानात्मक वाटल होतं पण माझ्या गुरूंना ते आवडलं नाही. त्या मला म्हणाल्या की तू इतर आयटम सॉंग सदर करणाऱ्या मुलींना कथ्थक नृत्याबद्दल टाळ्या घेताना पाहिलं आहेस का? मग तुझ्याकडे जे आहे ते गमवायचे का? तुझी प्रतिमा सांभाळणे हे तुझ्या हातात असते. मलाही ते मनोमन पटले मग मी तो मार्गाच बंद केला. मी अभिनेत्री होण्यासाठी नृत्य शिकले नव्हते तर त्यातून मला अभिनयासाठी काम मिळत होते. मी अनेकदा कार्याक्रम आहेत म्हणून अनेक चित्रपटांना नाही म्हणाले. मला त्याचे फार दुःख वाटले नाही. कारण खरंच एक कथ्थक नृत्यांगना म्हणून मला जो आदर मिळत होता तो जास्त प्रिय वाटला.”
अदिती आज भारतात व परदेशात अनेक ठिकाणी शिबिर आयोजित करते. स्वतःचे विद्यार्थीही ती मोजकेच निवडते. प्रत्येक ठिकाणी ती प्रशिक्षणासाठी स्वतः हजर असते. स्वतःच्या नावाखाली क्लास किंवा शिबीर चालवणं आणि स्वतःच तिथे हजर न राहणं हे तिला पटत नाही. “शिकवणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे” असं ती म्हणते. तिला देशातील व परदेशातील विद्यार्थ्याबद्दल विचारले तर ती म्हणते, “नृत्याबाद्दलाचे प्रेम कुठेही कमी नसते. पण संकल्पना फार समजावून सांगाव्या लागतात. (मिश्किलपणे) आजच्या मुलांना इथेही सर्वच समजवावं लागते तरीही..... परदेशातील विद्यार्थ्यांना राधा आणि कृष्णाची छेडछाड सांगावी लागते, फुल आणि भुंग्याचे नाते भारतीय संदर्भात वेगळे आहे ते परदेशात फारच यांत्रिकपणे घेतले जाते. पण आपल्या संगीताला, नृत्याला परदेशात फार पसंत केले जाते, तिकडे याबद्दल फार आदर आहे.” यालाच जोडून अदितीने एक गमतीशीर गोष्ट सांगितली. अदितीला वन बीटचा परिवार ‘टकटक’ म्हणत. तिने तिकडे एखादा तराना सादर केला तर ते सारे अचंबित होत असत. ते म्हणायचे की तुम्ही इतक्या साऱ्या हरकती लक्षात कशा ठेवता.
तरीही कलेच्याबाबतीत भारतीय विचारसरणीबद्दल तिने थोडी खंत बोलून दाखवली. “भारतात इतकी समृद्ध कला आहे की वानाबीटसारखी फेलोशिप फक्त भारतातही यशस्वी होऊ शकते. पण अनेकदा चौकटीपलीकडे विचार केला जात नाही. शास्त्रशुद्ध पारंपारिक नृत्य सादर करण्यासाठी चौकटच योग्य आहे पण नवनवे प्रयोग करताना त्या रूढी मोडल्या पाहिजेत तेव्हाच तो नवा प्रयोग होतो. भारतात हे विचार उघडत नाहीत. तो बदल हळूहळू घडेल अजून वेळ लागेल. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. आपल्याकडे निदान शहरांमध्ये बॉलीवूडचा इतका मोठा पगडा आहे की तेच फार चांगले असते असं प्रत्येकाला वाटते. पण त्यापलीकडेही जग आहे, असू शकत किंवा ते कोणीतरी निर्माण केले पाहिजे याचा विचार केला जावा. परदेशात नियम बघितले जात नाहित त्यातील नाविन्यता बघितली जाते. तिकडे दृष्टीकोन महत्वाचा असतो. त्यातून मिळणारा अनुभव महत्त्वाचा असतो. आणि मग त्यावरती त्यांना अनुदान मिळते, योग्य ते मानधन मिळते. शेवटी कलाकारालाहि त्या साऱ्याची आवश्याकता असते.”
अदिती तिच्या कलेचा वापर तिच्या समाजाप्रती करण्याचा नेहमी प्रयत्न करते. तिने अनेक शाळांमध्ये  अनाथ आश्रम, महिलाश्रम येथे जाऊन काही शिबीर घेतलेली आहेत. त्यांना लेक्चर दिलेले आहेत. ती स्वतःचे आवर्तन नावाचे एक प्रोडक्शनही सांभाळते. त्याशिवाय तिला स्वयंपाक करायला आवडतो, ती चांगली चित्र काढते. पोहणे तिला आवडते, वाचायला आवडते. तिला सायकलिंग करायला आवडते. हि आवड मात्र ती परदेशी गेल्यावरच भगवते. तिला वेगवेगळ्या संकृतींची आवड आहे.... सध्या ती पेटी वाजवायला व गाणं शिकते आहे. ती जर्मन भाषा शिकली आहे. पर्शियन भाषा ती शिकत आहे. नुकताच तिने शिवावर संशोधन केले होते. अगदी शाळेपासून वेगवेगळे स्टॅंप्स गोळा करण्याची तीला आवड आहे.
कथ्थकसाठी तिला खूप उर्जा आवश्यक असते. त्यासाठी ती कमीतकमी २ तास व जास्तीत जास्त सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सराव करत असते. आहारातही समतोल आहार घेते. भरपूर भाज्या, फळं, तूप, मांसाहार, अंडी, नारळ पाणी, लिंबू असे पदार्थ ती कायम आपल्या आहारात घेते. त्यामुळेच ती स्वतःला उत्साही ठेऊ शकते असे ती म्हणते.
“कला हि आजकाल केवळ शिकण्यासाठी शिकली जाते किंवा कोणत्या तरी रिअलिटी शोमध्ये सहभाग घेण्यासाठी शिकली जाते. पण कला जोपासण्यासाठी शिकण्याचा दृष्टीकोन कमी होतोय. कोणतीही कला जोपासण्यासाठी शिकावी. त्याच्याबद्दल आदर असावा. आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात कलेविषयी किती इतिहास आढळतो...? शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश झालं पाहिजे. उद्या कोणी फार यशस्वी कलाकार होईलच असे नाही पण एखाद्या कलाकाराला मनापासून दाद तर देता येईल.” कलेबद्दलची अदितीची आत्मीयता तिच्या या विधानातून पुन्हा एकदा झणकारली.       

अदितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी:
http://www.youtube.com/watch?v=QdY23Frjjkc





Monday 28 October 2013

राजसाहेब ठाकरे यांचे प्रत्यक्ष ऐकलेले भाषण

रविवारी (२७/१०/२०१३) संध्याकाळी आमंत्रणावरून एका काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व एका अल्बमचे विमोचन सोहळ्यास गेले होते. प्रकाशन म.न.से.चे पक्षप्रमुख माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. त्याठिकाणी त्यांनी २ मिनिटे भाषण केले. ते असे होते.
साहेबांना २ शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. ते उठले तशा प्रेक्षकांनी एकच गलका केला. माईकजवळ पोहोचताच शिस्तबद्ध श्रोत्यांप्रमाणे सर्वत्र शांतता झाली.
एका तान्हीने निरागसतेने आवाज केला: येऽऽऽऽ
साहेब: हां, काय आहे.
एकच हशा पिकला गेला. हशा शांत झाला तसा दुसरी एक चिमुरडी मोठ्या माणसांचे अनुकरण करत मोठ्याने हसत राहिली. तिचे हास्य सगळ्यात शेवटी शांत झाले.
साहेब: हा काय उशिरा लाफ्टर आला वाटतं. आजकाल सगळीकडे एक फॅशन झाली आहे की मी जिकडे जातो तिकडे माझ्या नावापुढे ‘वक्तृत्त्व-कर्तृत्त्व’ असे काही बाही बोलले जाते. (निवेदिका समीरा गुर्जर हिने तिच्या प्रस्तावनेत साहेबांच्या नावापुढे हिच शब्द वापरली होती. तो तिचा प्रयत्न साहेबांना वायफळ वाटला असावा म्हणून कदाचित हा टोला असावा) माझे वडील संगीतकार होते म्हणून मला संगीताचा कान आहे. पण माझ्या हातून अल्बमचे प्रकाशन व्हावे म्हणजे...... (हशा) त्यादिवशी मला बाळा नांदगावकर यांनी सांगितले की तुम्हाला ध्वनिफितीचे प्रकाशन करायला जायचे आहे. तर मला वाटले की काय काय आपल्या वाट्याला येणार आहे कोणास ठाऊक.(हशा). आपल्याला काय सांगितले करायला तर करायचे. (हशा). (ध्वनिफितीचे नावाचा; ‘हृदयातील एक हळुवार कोपरा’ संदर्भ घेत) हे काय हळुवार कोपरा वगैरे....... आपल्याला हळुवार काही जमतच नाही. आपण जे करतो ते जोरदार करतो. (हशा) मला आत्ताच कळले की ते (कवी) व्यायाम वगैरे करतात. (कवीचा मुख्य व्यवसाय व्यायामक्षेत्र आहे) म्हणजे पुढल्या वर्षी ‘मांडीवर एक हळुवार मसल्स’ वगैरे नका करू..... (हशा) वजन उचलणारा माणूस शब्दात वजन कसा आणतो मला कळले नाही. (हशा) त्याबद्दल त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. आपल्या गाणे ऐकण्याच्या कार्यक्रमात मी व्यत्यय आणल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज तुम्ही अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकायला इथे आला आहात. तर येणा-या दिवाळीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हि दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, समृद्धीची व आरोग्यदायी जावो. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!!!              

Friday 16 August 2013

पाणी पाणी रे.....

एकदा मुंबईतल्या ताडदेव येथे मिळणाऱ्या प्रसिद्ध हॉटेल सरदारची पावभाजी खायला गेलो. पावभाजी तर चविष्ठ होतीच पण ती खाऊन आम्ही बाहेर पडलो आणि बस स्टॉपवर येऊन उभे राहिलो. बराच वेळ बसची वाट बघितली. तहान लागली म्हणून मी त्याच सरदार पाभाजीकडे गेली व पाणी मागितले; त्यावर त्या वेटरने मला ‘मॅडम मिनरल वॉटर नाही चलेगा’ असं विचारलं. मी त्याच्या प्रश्नाने आव्वाक झाले. कारण मी त्याच पावभाजी सेंटर मधून पावभाजी खाऊन बाहेर पडले होते तरीही त्याने मला एक ग्लास पाणी मागितले तर चक्क ‘पाणी विकत घेणार का?’ या अर्थाचा प्रश्न विचारला होता. ‘का रे बाबा एक ग्लास पाणीही तुला महाग झाले का?’ असा प्रश्न मी त्याला विचारल्यावर मग त्याने मला पाणी आणून दिले.
आजकाल प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या स्टॉलवर मिनरल वॉटरच्या पाण्याच्या बाटल्या अतिशय आकर्षक पद्धतीने लावलेल्या असतात. प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वेटर येऊन विचारतो, “मिनरल वॉटर की नॉर्मल वॉटर’, प्रत्येक सिनेमागृहात स्वतःच्या बॅगेतून पाण्याची बाटली नेण्यास परवानगी नसते. मुख्यतः पाणी पिण्यासाठीही जर का नागरिकांना पैसे द्यावे लागत असतील तर त्याहून दुसरी खेदाची बाब नाही. आणि या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही ही तर पहिली खेदाची बाब आहे. कारण आता पाणी सहज उपलब्ध असते या कारणाने आपण खुश होत राहतो पण ते पाणी पैसे देऊन मिळणार असते म्हणजे ते काही सहज मिळणार नसते हे तरी समजून घ्यायला पाहिजे. पण आपल्याकडे या गोष्टी लक्षात कोण घेतो या कप्प्यात टाकल्या जातात.
माझ्या लहानपणी मला आठवते तोपर्यंत तर अनेक ठिकाणी काही धार्मिक संस्थांच्या किंवा काही समाजाच्या नावाने पाणपोई चालवल्या जात असत. तिकडे थंड पाण्याला १ रुपया किंवा ५० पैसे लागत व साधे पाणी फुकट मिळत असे. आता अशा पाणपोई दिसणे अशक्यच आहे. तेथील पाणी अतिशय स्वच्छ व पेलेही व्यवस्थित धुतलेले असत. त्या पाणपोई कोणी बंद पाडल्या....? अनेकदा रस्त्यावरून चालता चालता तहान लागली तर आजूबाजूच्या घरांतून, दुकानातून किंवा अगदीच नाही तर हॉटेलमधून पाणी मागून पिण्याची सोय होती. आज कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यास स्वतः तहान लागलेला व्यक्तीही पाणी मागत नाही तर तो मिनरल वॉटरची बाटली खरेदी करतो. गोरेगाव येथील रत्ना हे हॉटेल काही वर्षांपूर्वी शाळेतून दुपारच्या वेळेस परत जाणाऱ्या मुलांना प्यायला पाणी देत असे. अर्थात, शाळेतून परत जाणारी मुलं म्हणजे घोळकाच असे तो. त्यांना पाणी देताना अनेक ग्लास वारंवार मुलांना द्यावे लागत. त्या हॉटेलमधूनही हा रतीब नियमित पाळला जात होता. आता प्रत्येक दुकानातही पाण्याची बाटली विकत मिळू लागली आहे मग कोणीही उगाच पाणी फुकट देण्याचे उदारभाव का दाखवेल. मला माझ्या गावाच्या एका भावाने सांगितलेलं की परीक्षेला किंवा कोणत्याही कामाला जाताना जर रस्त्यावरून पाणी घेऊन जाणारी बाई दिसली तर तिच्याकडून पाणी मागावे. तुम्ही ज्या कामाला जाता आहात ते काम व्यवस्थित पार पडते. हि गोष्ट कोणी मानावी किंवा न मानवी त्याबद्दल वाद नाही पण मुळात पाणी घेऊन जाणाऱ्या बाईकडून पाणी मागण्याची सोय होती तर.....
मुंबईतील रेल्वे स्थानक आठवून पहावीत.... तिकडे पिण्याच्या पाण्याच्या ज्या टाक्या असतात त्याची अवस्था तर अवर्णनियच म्हणावी लागेल. त्यांची कित्येक वर्षात स्वच्छता झालेली नसते. त्यात पाणी असते की नाही इथपासून शंकेसाठी जागा आहे. शिवाय नळ कधी गळकेच असतात तर कधी अजिबात चालत नसतात.  मग त्या टाक्या तिथे असण्याचे कारण काय...? तिथला खाण्याच्या स्टॉलवर मात्रा मिनरल वॉटरच्या बाटल्या अगदी रुबाबात लटकत असतात. रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रसाधनगृहांची तर चर्चाच करता येणार नाही. त्याबद्दल मी पुन्हा कधीतरी लिहेन. असेच काहीसे चित्र असते ते बहुतेक सिनेमागृहांत.... तेकडेही एकतर खाण्याच्या पदार्थांच्या किमती या बाहेर मिळणाऱ्या किमतींच्या तुलनेत दुप्पट असतात. आता त्या दुप्पट का असतात यामागे काही ठोस कारण असेल असे मला वाटत नाही. तरीही आपण मुद्द्यावर येऊया ते म्हणजे तिकडे मिळणाऱ्या पाणी संस्कृतीवर. सिनेमागृहांत पाणी नेऊ देत नाहीत. मग मध्यातरानंतर आत तिकडेच मिळणारा खाऊ व कोल्ड्रिंक कसे आत नेणे शक्य असते. त्या सिनेमागृहांत पिण्याच्या पाण्याची लहान बाटलीही मिळत नाही घ्यायची असल्यास मोठी बाटलीच घ्यावी लागते. पण तिथली प्रसाधनगृह मात्र अतिशय स्वच्छ, अद्ययावत व भरपूर पाणी पुरवठा करणारी असतात. तिथे प्रशस्त जागा असते. पण पाण्यासाठी तिथला पाणी पुरवठा तोकडा होतो. याची कारणं ०९८पो; कोण विचारणार...? या सर्वांचा जाब कोण विचारणार...?
नाशिक किंवा नागपूर या शहरांत एक टेम्पो चालक आहेत. ते भर उन्हाळ्यात आपल्या टेम्पोमध्ये पिण्याच्या पाण्याची एक टाकी घेऊन मैलोन्मैल प्रवास करतात. उन्हाळ्यात पाण्याची तहान भागवता यावी व पाण्याविना कोणालाही त्रास होऊ नये हाच त्यांचा उद्देश असतो. मग असे काही प्रयोग मुंबई-पणे सारख्या शाहारांत का होत नाहीत. इथेही पाण्याची तितकीच गरज असते. पण इथला समाज हा अधिकाधिक चैनीच्या मागे धावणारा आहे. त्याला मिनरल वॉटर हे एक उच्च वर्गाचे प्रतिक वाटते. म्हणजे ज्याच्या हातात मिनरल वॉटरची बाटली तो अधिक समाजभान असालेला असं गैरसमज समाजात भिनलेला आहे. पण घरातून आणलेली पाण्याची बाटली बाहेर काढून ते पाणी पिणे हे कमीपणाचे वाटते. घराघरांतून पाणी मागणे, दुकानांत किंवा हॉटेलमधून पाणी मागणे हेदेखील कमीपणाचे वाटते.
पाण्याच्या बाबतीत आताशा अनेक जाहिरातींमधून पाणी स्वच्छ नाही. आजारपण किंवा संसर्ग होण्याच्या शक्यता सामान्य माणसाच्या मनावर ठळकपणे बिंबवल्या जातात. जर पाणी स्वच्छ नसणे आणि त्यामुळे मिनरल वॉटर पिण्याचा ट्रेंड वाढत आहे तर मुळात ते मिनरल वॉटरध्ये किती मिनरल असतात याचाही विचार करावा. ते किती शुद्ध असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्यापैकी किती जण करतात. म्हणजे जर ते पाणी निर्जंतुक आहे की नाही याची खात्रीच नसेल तर त्यासाठी पैसे का मोजावेत.
नाक्यानाक्यावर बंद पडलेल्या पाणपोई पुन्हा सुरु झाल्या तर त्या किती चालतील? किती जण त्या ठिकाणी येऊन पाणी पितील? किती जणांना त्यावर विश्वास असेल की तिथले पाणी हे स्वच्छ आणि पिण्यास योग्य आहे. मग अशा ठिकाणी ज्या पाणी निर्जंतुक करण्याचे यंत्र विकणाऱ्या कंपनींनी त्या पाणपोईवर आपल्या मशीन का नाही लावत किंवा तशा पाणपोई स्वतः सुरु का नाही करत? प्रत्येक सिनेमागृहात जर प्रसाधनगृह स्वच्छ ठेवण्यात लाखो लिटर पाणी व तसेच पाण्यासारखे रुपये खर्च केले जात असतील तर एखादे पाणी निर्जंतुकीकरण करणारे यंत्र लावून तेथे मोफत पाणी पिण्याची सोय का नाही ठेवता येत? रेल्वेच्या टिकतात पिण्यासाठी पाणी व स्वच्छ प्रसाधनगृह मिळाले पाहिजेत हा नागरिकांचा हक्क आहे हे नागरीकांना कधी कळणार? पिण्याचे पाणी जर इतकेच जीवावर बेतणारे असेल तर पाणी हे जीवन आहे किंवा पाणी देण्यासारखे पुण्य नाही असे का म्हटले जाते.......?
प्रश्नांची सरबत्ती तर कधी सुटणार नाही पण जिथे प्रश्न तिथे उत्तरं मिळवण्याचा ध्यास हवा.या सगळ्याला आळा घालण्याचे प्रशासनाच्या माथी मारण्याआधी ते काम नागरिकांनी स्वतः करायाला हवे. म्हणजे काय की आपल्या घरात आपण जे पाणी पितो तेच पाणी सोबत घेऊन घराबाहेर निघावे. जिथे जाल तिकडे जर पिण्याचे पाणी उपलब्ध असेल तर तिथून पाण्याची बाटली री-फिल अर्थात भरून निघावे. रेल्वे स्थानकावर जो अधिकारी असतो त्याला जाऊन पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ झालेली नाहीये किंवा प्रसाधागृह स्वच्छ झालेले नाहीये अशी तक्रार करावी. त्यावर लगेच कृती केली जावी अशी अपेक्षा ठेऊ नये. पण अशी तक्रार अनेकवेळा अनेकजणांकडून गेली तर त्यावर नक्की कृती होईल हा विश्वास ठेवावा. पाणी काय जसे वळवाल तसे वळते पण या पाण्याने आपल्याला वळवावे असे होऊ देऊ नये.

Friday 8 March 2013

८ मार्च २०१३

८ मार्च, जागतिक महिला दिन. हा दिवस दरवर्षी शुभेच्छा घेऊन येतो. कधी न झोपलेला स्त्री असल्याचा अभिमान जागा करण्याची धडपड करत...... खरच हा दिवस  शुभेच्छा देण्याइतका आनंदी असतो? मला अनेक प्रश्न पडले. त्याची उत्तर मिळतील अशी मी अशाच बाळगली नव्हती. अगदी काही दिवसच लोटले असतील त्या घटनेला, दिल्लीतील बलात्कार प्रकरण.... कल्पनेनेच किळसवाणे वाटते आणि क्षणभर मनाला भीती दचकावून जाते. अशा अनेक बातम्या कानावर पडतात आणि अशा अनेक बातम्या वाचनात येत राहतात. अनेक कथाबाह्य कार्यक्रमातून दाखवले जाणारे रुपांतरीत किस्से पाहून मन अस्वस्थ होते. अशा अस्वस्थतेत हा दिवस आनंदी कसा होऊ शकतो.
 
यावर्षीचा हा आतरराष्ट्रीय महिला दिवस मी त्या सर्व महिलांना, मुलींना आणि आईंना अर्पण करते ज्यांनी मला माझ्याच समाजातील एक प्रतिबिंब दाखवले. रात्री अपरात्री एकटी बाहेर फिरण्याची निर्भीडता दिली आणि त्याचबरोबर मी किती असुरक्षित आहे याची जाणीव करून दिली. बलात्कार तर फार दूर राहतो जेव्हा मुलींना आईच्या गर्भातच मारून टाकले जाते. घरगुती हिंसा, बलात्कार, छेडाछेडी, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, अशा अनेक दिव्यातून ती तग धरून उभी राहते. आणि मग अशाच एका 'दामिनी'साठी किंवा दामिनिसारख्यांसाठी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. पुन्हा फिरून येतो हा दिवस पोकळ  शुभेच्छा घेऊन. आणि आतून उचंबळत राहतात या  शुभेच्छांमागील प्रश्नचिन्ह??????

महिला दिनाचे नीमीत्त साधून मी हा माझा ब्लॉग सुरु केला आहे. अनेक दिवस हि मनातील इच्छा मनातच रमलेली होती. आज ती स्वःतःलाच एखादी भेटवस्तू द्यावी तशी भेट म्हणून दिली आणि पूर्ण केली. बस यापुढे यावर नक्की काहीतरी वेगवेगळे लिहित राहेन. माझ्या ब्लोगला जरूर भेट द्या व लेखनाबद्दल प्रतिक्रिया जरूर कळवा. शेवटी एक महिला म्हणून प्रत्येक महिलेसाठी समाजातल्या प्रत्येकाला मी सांगते,

'हो, महिलादिन आनंदीच असावा हि माझी मागणी आहे'

- काजल नाईक