Friday 29 November 2013

भारतीय नृत्याचे आंतरराष्ट्रीय फ्युजन- अदिती भागवत

पूर्वप्रसिद्धी: चित्रलेखा, प्रियदर्शिनी (२६ ऑगस्ट २०१३)
         माझी सहेली (दिवाळी २०१३)

एका रंगलेल्या संगीत मैफलीत तीन विदेशी वादक सतार, गीटारसारखी वाटणारी पण वेगळी अशी काही वाद्य घेऊन कार्यक्रम सुरु करण्याच्या तयारीत आहेत. इतक्यात रीत्रीची गडद निळाई पांघरल्याप्रमाणे निळाशार गाऊन घालून आम्बोड्यात निळे फुल खोउन एक भारतीय तरुणी मंचावर अवतरते. हि नृत्य सादर करणार आहे का.... नाही... ही तर एक बाजूला जाऊन उभी आहे. मैफल सुरु होते आणि अजूनही हि तरुणी नेमकी काय करणार आहे हे उमगलेलं नसतानाच ती आपला गाऊन वर धरते व वादकांच्या तालावर घुंगरू बांधलेल्या पायाचा एक ठेका घेते आणि त्याबरोबर एक विलक्षण अनुभवाची प्रचीती येते. अरे... ही तर आपली अदिती भागवत आहे.
संगीत क्षेत्रातील वनबीट या आंतरराष्ट्रीय संस्थेचे हे सारे वादक आहेत. अमेरिकेच्या राज्यस्तरीय सांकृतिक विभागाने व न्यूयॉर्कमधील ‘बँग ओन अ कॅन’ या प्रसिद्ध संस्थेचीच असलेली एक उपशाखा ‘फाउड साउंड नेशन’ या संस्थेने मिळून ‘वन बीट’ नावाचा एक फेलोशिप उपक्रम आखला आहे. जगभरातील वेगवेगळ्या माध्यमातून संगीत क्षेत्रात निराळे व अनोखे प्रयोग करणारे व आपले योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी ही फेलोशिप आहे. पण अदिती तर कत्थक नृत्यांगना आहे आणि ती चक्क संगीत विषयातील फेलोशिपसाठी इथे काय करतेय, असा प्रश्न कोणालाही पडेल. अदिती केवळ कथ्थक नृत्यांगना म्हणून ओळखली जात नाही तर ती अभिनयही करते. निवेदन करते, ती ओडिसी नृत्यप्रकार ही शिकली आहे. शिवाय गेले १० ते १२ वर्ष तिने कथ्थकसोबत इतर नृत्यप्रकारातील मेळ साधून काही फ्युजन प्रयोगही केले आहेत. अशाच एक प्रयोगापैकी तीचा एक प्रयोग तिने वनबीट या फेलोशिपसाठी केला आहे. ‘फुट पर्केशनीस्ट’ म्हणून तिने नृत्यांगना असूनही एक संगीतकार म्हणून २०१२ या पहिल्याच वर्षी आंतरराष्ट्रीय फेलोशिप संपादित केली.
फुट पर्केशनीस्ट; पायांच्या आघाताने नादमय संगीत निर्माण करणे. अदितीने आपल्या कथ्थक निपुणतेचा पाया घेऊन कथ्थकमधील पदन्यास किंवा तत्त्कार या शैलीचा वापर करत संगीत तयार केले. “वनबीटसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही साधी सोप्पी नव्हती तर त्यातही अनेक आव्हान होती. याची प्रवेश प्रक्रिया एकूण ४ ते ५ महिन्यांची होती. जानेवारी-फेब्रुवारी २०१२ला सुरु झाली होती. त्यांची एक प्रश्नावली असते त्यात केवळ स्वतःची माहिती देणं अपेक्षित नसतेच तर कलाकार म्हणून कला किंवा त्याची सांगड याबद्दल तुमचा दृष्टीकोन काय आहे हे त्यांना अपेक्षित असते. म्हणजे तुम्ही काय पद्धतीने काम केले आहे, तुमच्या कामातून सामाजिक बांधिलकी जपली आहेत का, आजच्या पिढीचे कलाकार म्हणून तंत्रज्ञानाचा तुमच्या कलेत कसा वापर करता? असे अनेक प्रश्न विचारले जातात. शिवाय तुमचे फोटो, तुमचे विडीओ त्यांना पाठवावे लागतात. यात माझी निवड झाली व जूनमध्ये मला त्यांचा फोन आला. हि प्रक्रिया काही फार सोप्पी नव्हतीच. पण या सगळ्याची मी पूर्वतयारी केली होती. ज्यामुळे माझे काम त्यांना आवडले व एकूण ४० देशांमधून ३२ कलाकार निवडले गेले. त्यांनतर निवडलेल्या एकूण कलाकारांपैकी तुम्हाला कोणत्या कलाकारांबरोबर काम करायला आवडेल हे त्यांनी विचारले होते. त्या सर्वांची यादी त्यांनी पाठवली होती. मग त्या कलाकारांचा कामाचा आढावा मी जवळ-जवळ आठवडाभर घेत होते आणि मग पुन्हा एक अर्ज द्यायचा होता. भारताचे प्रतिनिधित्व मी केले व सप्टेंबर-ओक्टोबर २०१२ ला हि फेलोशिप मला मिळाली.” अदिती अभिमानाने सांगत होती.
अदितीने निवडताना काही तंतुवाद्य वादाकांसोबत काम करायचे ठरवले पण प्रत्यक्ष जेव्हा सर्व कलाकारांची भेट झाली तेव्हा मात्र प्रत्येकासोबत तीला काम करायला मिळाले. क्वॉट्रो (चार तारा असलेली गिटार), इराकमधील एक संतूर, कोरिओमधील गयागुम, अमेरिकेतील बेन्जो, टांझियामधील घुमरी हे वाद्य, असे अनेक देशातील वेगवेगळी तंतुवाद्य होती. त्यांच्यासोबत अदितीने पदन्यास व तत्त्कार यांची साथ घेऊन काम केले आणि घुंगरू हे तिने तिचे वाद्य म्हणून वापरले. अनेकदा तबल्यासोबत साथ-सांगत म्हणून पदन्यास किंवा तत्कार केले जातात पण घुंगरुच वाद्य म्हणून वापरण्याची अदितीची ही संकल्पना खरोखरच उल्लेखनीय आहे.
हि संकल्पना अदितीला तिच्याच कामातून सुचली होती. तिने भारतात तिच्या कार्यक्रमांतून पदन्यास व तत्त्कारमधून अनेक फ्युजन प्रयोग केले होते. त्यामुळे हे काम पुढे गेले पाहिजे या उद्देशाने तिने या फेलोशिपसाठी अर्ज केला होता व तिथे तिला असे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी अक्षरशः अनेक पटींनी वाव मिळाला होता.
अदितीच्या आईने तिला अगदी चौथ्या वर्षीच नृत्य शिकायला पाठवले. जयपूर घराण्यातील पद्मश्री रोषन कुमारीजी यांच्याकडे तिने प्रशिक्षण घेतले. अदितीने चौदाव्या वर्षीच पहिला कार्यक्रम दिला होता. कथ्थकमधूनच तिने गांधर्व महाविद्यालयातून एम.ए. पूर्ण केले. शैक्षणिक विषयात तिने सायकोलोजी विषय घेऊन एम.ए. केले आहे. लयकारी व तालाचे शिक्षण घेतले. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे या अदितीच्या ओडिसी नृत्याच्या गुरु आहेत. २००३ मध्ये आकृती या चमुसोबत पहिल्यांदा तिने जॅझ लावणी आणि जॅझ कथ्थकचे कार्क्रम केले. त्यानंतर अनेक दिग्गजांबरोबर कार्यक्रम करण्याचे तिचे पर्व सुरु झाले. त्यानंतर तिने परदेशी हि अनेक कार्यक्रम केले. सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला तो राजभावनमध्ये. त्यासोबतच तिने मालिका, चित्रपट व सुत्रसंचालनही केले. एका पेक्षा एक या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची ती परीक्षक होती. गेल्याच वर्षी तिने ‘म्योहो’ नावाचा एक प्रायोगिक चित्रपटही केला आहे व त्यात तिने नृत्यांगानेचीच भूमिका केली आहे व स्वतःचे नृत्य स्वतःच दिग्दर्शित केले आहे. मधुर भांडारकरच्या ट्राफिक सिग्नल या सिनेमातील तिने केलेलले आयटम सॉंगमुळे तिला कारकिर्दीतील धडा मिळाला होता. अदिती सांगत होती, “मला ते काम थोडं आव्हानात्मक वाटल होतं पण माझ्या गुरूंना ते आवडलं नाही. त्या मला म्हणाल्या की तू इतर आयटम सॉंग सदर करणाऱ्या मुलींना कथ्थक नृत्याबद्दल टाळ्या घेताना पाहिलं आहेस का? मग तुझ्याकडे जे आहे ते गमवायचे का? तुझी प्रतिमा सांभाळणे हे तुझ्या हातात असते. मलाही ते मनोमन पटले मग मी तो मार्गाच बंद केला. मी अभिनेत्री होण्यासाठी नृत्य शिकले नव्हते तर त्यातून मला अभिनयासाठी काम मिळत होते. मी अनेकदा कार्याक्रम आहेत म्हणून अनेक चित्रपटांना नाही म्हणाले. मला त्याचे फार दुःख वाटले नाही. कारण खरंच एक कथ्थक नृत्यांगना म्हणून मला जो आदर मिळत होता तो जास्त प्रिय वाटला.”
अदिती आज भारतात व परदेशात अनेक ठिकाणी शिबिर आयोजित करते. स्वतःचे विद्यार्थीही ती मोजकेच निवडते. प्रत्येक ठिकाणी ती प्रशिक्षणासाठी स्वतः हजर असते. स्वतःच्या नावाखाली क्लास किंवा शिबीर चालवणं आणि स्वतःच तिथे हजर न राहणं हे तिला पटत नाही. “शिकवणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे” असं ती म्हणते. तिला देशातील व परदेशातील विद्यार्थ्याबद्दल विचारले तर ती म्हणते, “नृत्याबाद्दलाचे प्रेम कुठेही कमी नसते. पण संकल्पना फार समजावून सांगाव्या लागतात. (मिश्किलपणे) आजच्या मुलांना इथेही सर्वच समजवावं लागते तरीही..... परदेशातील विद्यार्थ्यांना राधा आणि कृष्णाची छेडछाड सांगावी लागते, फुल आणि भुंग्याचे नाते भारतीय संदर्भात वेगळे आहे ते परदेशात फारच यांत्रिकपणे घेतले जाते. पण आपल्या संगीताला, नृत्याला परदेशात फार पसंत केले जाते, तिकडे याबद्दल फार आदर आहे.” यालाच जोडून अदितीने एक गमतीशीर गोष्ट सांगितली. अदितीला वन बीटचा परिवार ‘टकटक’ म्हणत. तिने तिकडे एखादा तराना सादर केला तर ते सारे अचंबित होत असत. ते म्हणायचे की तुम्ही इतक्या साऱ्या हरकती लक्षात कशा ठेवता.
तरीही कलेच्याबाबतीत भारतीय विचारसरणीबद्दल तिने थोडी खंत बोलून दाखवली. “भारतात इतकी समृद्ध कला आहे की वानाबीटसारखी फेलोशिप फक्त भारतातही यशस्वी होऊ शकते. पण अनेकदा चौकटीपलीकडे विचार केला जात नाही. शास्त्रशुद्ध पारंपारिक नृत्य सादर करण्यासाठी चौकटच योग्य आहे पण नवनवे प्रयोग करताना त्या रूढी मोडल्या पाहिजेत तेव्हाच तो नवा प्रयोग होतो. भारतात हे विचार उघडत नाहीत. तो बदल हळूहळू घडेल अजून वेळ लागेल. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. आपल्याकडे निदान शहरांमध्ये बॉलीवूडचा इतका मोठा पगडा आहे की तेच फार चांगले असते असं प्रत्येकाला वाटते. पण त्यापलीकडेही जग आहे, असू शकत किंवा ते कोणीतरी निर्माण केले पाहिजे याचा विचार केला जावा. परदेशात नियम बघितले जात नाहित त्यातील नाविन्यता बघितली जाते. तिकडे दृष्टीकोन महत्वाचा असतो. त्यातून मिळणारा अनुभव महत्त्वाचा असतो. आणि मग त्यावरती त्यांना अनुदान मिळते, योग्य ते मानधन मिळते. शेवटी कलाकारालाहि त्या साऱ्याची आवश्याकता असते.”
अदिती तिच्या कलेचा वापर तिच्या समाजाप्रती करण्याचा नेहमी प्रयत्न करते. तिने अनेक शाळांमध्ये  अनाथ आश्रम, महिलाश्रम येथे जाऊन काही शिबीर घेतलेली आहेत. त्यांना लेक्चर दिलेले आहेत. ती स्वतःचे आवर्तन नावाचे एक प्रोडक्शनही सांभाळते. त्याशिवाय तिला स्वयंपाक करायला आवडतो, ती चांगली चित्र काढते. पोहणे तिला आवडते, वाचायला आवडते. तिला सायकलिंग करायला आवडते. हि आवड मात्र ती परदेशी गेल्यावरच भगवते. तिला वेगवेगळ्या संकृतींची आवड आहे.... सध्या ती पेटी वाजवायला व गाणं शिकते आहे. ती जर्मन भाषा शिकली आहे. पर्शियन भाषा ती शिकत आहे. नुकताच तिने शिवावर संशोधन केले होते. अगदी शाळेपासून वेगवेगळे स्टॅंप्स गोळा करण्याची तीला आवड आहे.
कथ्थकसाठी तिला खूप उर्जा आवश्यक असते. त्यासाठी ती कमीतकमी २ तास व जास्तीत जास्त सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सराव करत असते. आहारातही समतोल आहार घेते. भरपूर भाज्या, फळं, तूप, मांसाहार, अंडी, नारळ पाणी, लिंबू असे पदार्थ ती कायम आपल्या आहारात घेते. त्यामुळेच ती स्वतःला उत्साही ठेऊ शकते असे ती म्हणते.
“कला हि आजकाल केवळ शिकण्यासाठी शिकली जाते किंवा कोणत्या तरी रिअलिटी शोमध्ये सहभाग घेण्यासाठी शिकली जाते. पण कला जोपासण्यासाठी शिकण्याचा दृष्टीकोन कमी होतोय. कोणतीही कला जोपासण्यासाठी शिकावी. त्याच्याबद्दल आदर असावा. आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात कलेविषयी किती इतिहास आढळतो...? शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश झालं पाहिजे. उद्या कोणी फार यशस्वी कलाकार होईलच असे नाही पण एखाद्या कलाकाराला मनापासून दाद तर देता येईल.” कलेबद्दलची अदितीची आत्मीयता तिच्या या विधानातून पुन्हा एकदा झणकारली.       

अदितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी:
http://www.youtube.com/watch?v=QdY23Frjjkc





Monday 28 October 2013

राजसाहेब ठाकरे यांचे प्रत्यक्ष ऐकलेले भाषण

रविवारी (२७/१०/२०१३) संध्याकाळी आमंत्रणावरून एका काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व एका अल्बमचे विमोचन सोहळ्यास गेले होते. प्रकाशन म.न.से.चे पक्षप्रमुख माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. त्याठिकाणी त्यांनी २ मिनिटे भाषण केले. ते असे होते.
साहेबांना २ शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. ते उठले तशा प्रेक्षकांनी एकच गलका केला. माईकजवळ पोहोचताच शिस्तबद्ध श्रोत्यांप्रमाणे सर्वत्र शांतता झाली.
एका तान्हीने निरागसतेने आवाज केला: येऽऽऽऽ
साहेब: हां, काय आहे.
एकच हशा पिकला गेला. हशा शांत झाला तसा दुसरी एक चिमुरडी मोठ्या माणसांचे अनुकरण करत मोठ्याने हसत राहिली. तिचे हास्य सगळ्यात शेवटी शांत झाले.
साहेब: हा काय उशिरा लाफ्टर आला वाटतं. आजकाल सगळीकडे एक फॅशन झाली आहे की मी जिकडे जातो तिकडे माझ्या नावापुढे ‘वक्तृत्त्व-कर्तृत्त्व’ असे काही बाही बोलले जाते. (निवेदिका समीरा गुर्जर हिने तिच्या प्रस्तावनेत साहेबांच्या नावापुढे हिच शब्द वापरली होती. तो तिचा प्रयत्न साहेबांना वायफळ वाटला असावा म्हणून कदाचित हा टोला असावा) माझे वडील संगीतकार होते म्हणून मला संगीताचा कान आहे. पण माझ्या हातून अल्बमचे प्रकाशन व्हावे म्हणजे...... (हशा) त्यादिवशी मला बाळा नांदगावकर यांनी सांगितले की तुम्हाला ध्वनिफितीचे प्रकाशन करायला जायचे आहे. तर मला वाटले की काय काय आपल्या वाट्याला येणार आहे कोणास ठाऊक.(हशा). आपल्याला काय सांगितले करायला तर करायचे. (हशा). (ध्वनिफितीचे नावाचा; ‘हृदयातील एक हळुवार कोपरा’ संदर्भ घेत) हे काय हळुवार कोपरा वगैरे....... आपल्याला हळुवार काही जमतच नाही. आपण जे करतो ते जोरदार करतो. (हशा) मला आत्ताच कळले की ते (कवी) व्यायाम वगैरे करतात. (कवीचा मुख्य व्यवसाय व्यायामक्षेत्र आहे) म्हणजे पुढल्या वर्षी ‘मांडीवर एक हळुवार मसल्स’ वगैरे नका करू..... (हशा) वजन उचलणारा माणूस शब्दात वजन कसा आणतो मला कळले नाही. (हशा) त्याबद्दल त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. आपल्या गाणे ऐकण्याच्या कार्यक्रमात मी व्यत्यय आणल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज तुम्ही अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकायला इथे आला आहात. तर येणा-या दिवाळीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हि दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, समृद्धीची व आरोग्यदायी जावो. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!!!              

Friday 16 August 2013

पाणी पाणी रे.....

एकदा मुंबईतल्या ताडदेव येथे मिळणाऱ्या प्रसिद्ध हॉटेल सरदारची पावभाजी खायला गेलो. पावभाजी तर चविष्ठ होतीच पण ती खाऊन आम्ही बाहेर पडलो आणि बस स्टॉपवर येऊन उभे राहिलो. बराच वेळ बसची वाट बघितली. तहान लागली म्हणून मी त्याच सरदार पाभाजीकडे गेली व पाणी मागितले; त्यावर त्या वेटरने मला ‘मॅडम मिनरल वॉटर नाही चलेगा’ असं विचारलं. मी त्याच्या प्रश्नाने आव्वाक झाले. कारण मी त्याच पावभाजी सेंटर मधून पावभाजी खाऊन बाहेर पडले होते तरीही त्याने मला एक ग्लास पाणी मागितले तर चक्क ‘पाणी विकत घेणार का?’ या अर्थाचा प्रश्न विचारला होता. ‘का रे बाबा एक ग्लास पाणीही तुला महाग झाले का?’ असा प्रश्न मी त्याला विचारल्यावर मग त्याने मला पाणी आणून दिले.
आजकाल प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या स्टॉलवर मिनरल वॉटरच्या पाण्याच्या बाटल्या अतिशय आकर्षक पद्धतीने लावलेल्या असतात. प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वेटर येऊन विचारतो, “मिनरल वॉटर की नॉर्मल वॉटर’, प्रत्येक सिनेमागृहात स्वतःच्या बॅगेतून पाण्याची बाटली नेण्यास परवानगी नसते. मुख्यतः पाणी पिण्यासाठीही जर का नागरिकांना पैसे द्यावे लागत असतील तर त्याहून दुसरी खेदाची बाब नाही. आणि या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही ही तर पहिली खेदाची बाब आहे. कारण आता पाणी सहज उपलब्ध असते या कारणाने आपण खुश होत राहतो पण ते पाणी पैसे देऊन मिळणार असते म्हणजे ते काही सहज मिळणार नसते हे तरी समजून घ्यायला पाहिजे. पण आपल्याकडे या गोष्टी लक्षात कोण घेतो या कप्प्यात टाकल्या जातात.
माझ्या लहानपणी मला आठवते तोपर्यंत तर अनेक ठिकाणी काही धार्मिक संस्थांच्या किंवा काही समाजाच्या नावाने पाणपोई चालवल्या जात असत. तिकडे थंड पाण्याला १ रुपया किंवा ५० पैसे लागत व साधे पाणी फुकट मिळत असे. आता अशा पाणपोई दिसणे अशक्यच आहे. तेथील पाणी अतिशय स्वच्छ व पेलेही व्यवस्थित धुतलेले असत. त्या पाणपोई कोणी बंद पाडल्या....? अनेकदा रस्त्यावरून चालता चालता तहान लागली तर आजूबाजूच्या घरांतून, दुकानातून किंवा अगदीच नाही तर हॉटेलमधून पाणी मागून पिण्याची सोय होती. आज कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यास स्वतः तहान लागलेला व्यक्तीही पाणी मागत नाही तर तो मिनरल वॉटरची बाटली खरेदी करतो. गोरेगाव येथील रत्ना हे हॉटेल काही वर्षांपूर्वी शाळेतून दुपारच्या वेळेस परत जाणाऱ्या मुलांना प्यायला पाणी देत असे. अर्थात, शाळेतून परत जाणारी मुलं म्हणजे घोळकाच असे तो. त्यांना पाणी देताना अनेक ग्लास वारंवार मुलांना द्यावे लागत. त्या हॉटेलमधूनही हा रतीब नियमित पाळला जात होता. आता प्रत्येक दुकानातही पाण्याची बाटली विकत मिळू लागली आहे मग कोणीही उगाच पाणी फुकट देण्याचे उदारभाव का दाखवेल. मला माझ्या गावाच्या एका भावाने सांगितलेलं की परीक्षेला किंवा कोणत्याही कामाला जाताना जर रस्त्यावरून पाणी घेऊन जाणारी बाई दिसली तर तिच्याकडून पाणी मागावे. तुम्ही ज्या कामाला जाता आहात ते काम व्यवस्थित पार पडते. हि गोष्ट कोणी मानावी किंवा न मानवी त्याबद्दल वाद नाही पण मुळात पाणी घेऊन जाणाऱ्या बाईकडून पाणी मागण्याची सोय होती तर.....
मुंबईतील रेल्वे स्थानक आठवून पहावीत.... तिकडे पिण्याच्या पाण्याच्या ज्या टाक्या असतात त्याची अवस्था तर अवर्णनियच म्हणावी लागेल. त्यांची कित्येक वर्षात स्वच्छता झालेली नसते. त्यात पाणी असते की नाही इथपासून शंकेसाठी जागा आहे. शिवाय नळ कधी गळकेच असतात तर कधी अजिबात चालत नसतात.  मग त्या टाक्या तिथे असण्याचे कारण काय...? तिथला खाण्याच्या स्टॉलवर मात्रा मिनरल वॉटरच्या बाटल्या अगदी रुबाबात लटकत असतात. रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रसाधनगृहांची तर चर्चाच करता येणार नाही. त्याबद्दल मी पुन्हा कधीतरी लिहेन. असेच काहीसे चित्र असते ते बहुतेक सिनेमागृहांत.... तेकडेही एकतर खाण्याच्या पदार्थांच्या किमती या बाहेर मिळणाऱ्या किमतींच्या तुलनेत दुप्पट असतात. आता त्या दुप्पट का असतात यामागे काही ठोस कारण असेल असे मला वाटत नाही. तरीही आपण मुद्द्यावर येऊया ते म्हणजे तिकडे मिळणाऱ्या पाणी संस्कृतीवर. सिनेमागृहांत पाणी नेऊ देत नाहीत. मग मध्यातरानंतर आत तिकडेच मिळणारा खाऊ व कोल्ड्रिंक कसे आत नेणे शक्य असते. त्या सिनेमागृहांत पिण्याच्या पाण्याची लहान बाटलीही मिळत नाही घ्यायची असल्यास मोठी बाटलीच घ्यावी लागते. पण तिथली प्रसाधनगृह मात्र अतिशय स्वच्छ, अद्ययावत व भरपूर पाणी पुरवठा करणारी असतात. तिथे प्रशस्त जागा असते. पण पाण्यासाठी तिथला पाणी पुरवठा तोकडा होतो. याची कारणं ०९८पो; कोण विचारणार...? या सर्वांचा जाब कोण विचारणार...?
नाशिक किंवा नागपूर या शहरांत एक टेम्पो चालक आहेत. ते भर उन्हाळ्यात आपल्या टेम्पोमध्ये पिण्याच्या पाण्याची एक टाकी घेऊन मैलोन्मैल प्रवास करतात. उन्हाळ्यात पाण्याची तहान भागवता यावी व पाण्याविना कोणालाही त्रास होऊ नये हाच त्यांचा उद्देश असतो. मग असे काही प्रयोग मुंबई-पणे सारख्या शाहारांत का होत नाहीत. इथेही पाण्याची तितकीच गरज असते. पण इथला समाज हा अधिकाधिक चैनीच्या मागे धावणारा आहे. त्याला मिनरल वॉटर हे एक उच्च वर्गाचे प्रतिक वाटते. म्हणजे ज्याच्या हातात मिनरल वॉटरची बाटली तो अधिक समाजभान असालेला असं गैरसमज समाजात भिनलेला आहे. पण घरातून आणलेली पाण्याची बाटली बाहेर काढून ते पाणी पिणे हे कमीपणाचे वाटते. घराघरांतून पाणी मागणे, दुकानांत किंवा हॉटेलमधून पाणी मागणे हेदेखील कमीपणाचे वाटते.
पाण्याच्या बाबतीत आताशा अनेक जाहिरातींमधून पाणी स्वच्छ नाही. आजारपण किंवा संसर्ग होण्याच्या शक्यता सामान्य माणसाच्या मनावर ठळकपणे बिंबवल्या जातात. जर पाणी स्वच्छ नसणे आणि त्यामुळे मिनरल वॉटर पिण्याचा ट्रेंड वाढत आहे तर मुळात ते मिनरल वॉटरध्ये किती मिनरल असतात याचाही विचार करावा. ते किती शुद्ध असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्यापैकी किती जण करतात. म्हणजे जर ते पाणी निर्जंतुक आहे की नाही याची खात्रीच नसेल तर त्यासाठी पैसे का मोजावेत.
नाक्यानाक्यावर बंद पडलेल्या पाणपोई पुन्हा सुरु झाल्या तर त्या किती चालतील? किती जण त्या ठिकाणी येऊन पाणी पितील? किती जणांना त्यावर विश्वास असेल की तिथले पाणी हे स्वच्छ आणि पिण्यास योग्य आहे. मग अशा ठिकाणी ज्या पाणी निर्जंतुक करण्याचे यंत्र विकणाऱ्या कंपनींनी त्या पाणपोईवर आपल्या मशीन का नाही लावत किंवा तशा पाणपोई स्वतः सुरु का नाही करत? प्रत्येक सिनेमागृहात जर प्रसाधनगृह स्वच्छ ठेवण्यात लाखो लिटर पाणी व तसेच पाण्यासारखे रुपये खर्च केले जात असतील तर एखादे पाणी निर्जंतुकीकरण करणारे यंत्र लावून तेथे मोफत पाणी पिण्याची सोय का नाही ठेवता येत? रेल्वेच्या टिकतात पिण्यासाठी पाणी व स्वच्छ प्रसाधनगृह मिळाले पाहिजेत हा नागरिकांचा हक्क आहे हे नागरीकांना कधी कळणार? पिण्याचे पाणी जर इतकेच जीवावर बेतणारे असेल तर पाणी हे जीवन आहे किंवा पाणी देण्यासारखे पुण्य नाही असे का म्हटले जाते.......?
प्रश्नांची सरबत्ती तर कधी सुटणार नाही पण जिथे प्रश्न तिथे उत्तरं मिळवण्याचा ध्यास हवा.या सगळ्याला आळा घालण्याचे प्रशासनाच्या माथी मारण्याआधी ते काम नागरिकांनी स्वतः करायाला हवे. म्हणजे काय की आपल्या घरात आपण जे पाणी पितो तेच पाणी सोबत घेऊन घराबाहेर निघावे. जिथे जाल तिकडे जर पिण्याचे पाणी उपलब्ध असेल तर तिथून पाण्याची बाटली री-फिल अर्थात भरून निघावे. रेल्वे स्थानकावर जो अधिकारी असतो त्याला जाऊन पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ झालेली नाहीये किंवा प्रसाधागृह स्वच्छ झालेले नाहीये अशी तक्रार करावी. त्यावर लगेच कृती केली जावी अशी अपेक्षा ठेऊ नये. पण अशी तक्रार अनेकवेळा अनेकजणांकडून गेली तर त्यावर नक्की कृती होईल हा विश्वास ठेवावा. पाणी काय जसे वळवाल तसे वळते पण या पाण्याने आपल्याला वळवावे असे होऊ देऊ नये.

Friday 8 March 2013

८ मार्च २०१३

८ मार्च, जागतिक महिला दिन. हा दिवस दरवर्षी शुभेच्छा घेऊन येतो. कधी न झोपलेला स्त्री असल्याचा अभिमान जागा करण्याची धडपड करत...... खरच हा दिवस  शुभेच्छा देण्याइतका आनंदी असतो? मला अनेक प्रश्न पडले. त्याची उत्तर मिळतील अशी मी अशाच बाळगली नव्हती. अगदी काही दिवसच लोटले असतील त्या घटनेला, दिल्लीतील बलात्कार प्रकरण.... कल्पनेनेच किळसवाणे वाटते आणि क्षणभर मनाला भीती दचकावून जाते. अशा अनेक बातम्या कानावर पडतात आणि अशा अनेक बातम्या वाचनात येत राहतात. अनेक कथाबाह्य कार्यक्रमातून दाखवले जाणारे रुपांतरीत किस्से पाहून मन अस्वस्थ होते. अशा अस्वस्थतेत हा दिवस आनंदी कसा होऊ शकतो.
 
यावर्षीचा हा आतरराष्ट्रीय महिला दिवस मी त्या सर्व महिलांना, मुलींना आणि आईंना अर्पण करते ज्यांनी मला माझ्याच समाजातील एक प्रतिबिंब दाखवले. रात्री अपरात्री एकटी बाहेर फिरण्याची निर्भीडता दिली आणि त्याचबरोबर मी किती असुरक्षित आहे याची जाणीव करून दिली. बलात्कार तर फार दूर राहतो जेव्हा मुलींना आईच्या गर्भातच मारून टाकले जाते. घरगुती हिंसा, बलात्कार, छेडाछेडी, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, अशा अनेक दिव्यातून ती तग धरून उभी राहते. आणि मग अशाच एका 'दामिनी'साठी किंवा दामिनिसारख्यांसाठी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. पुन्हा फिरून येतो हा दिवस पोकळ  शुभेच्छा घेऊन. आणि आतून उचंबळत राहतात या  शुभेच्छांमागील प्रश्नचिन्ह??????

महिला दिनाचे नीमीत्त साधून मी हा माझा ब्लॉग सुरु केला आहे. अनेक दिवस हि मनातील इच्छा मनातच रमलेली होती. आज ती स्वःतःलाच एखादी भेटवस्तू द्यावी तशी भेट म्हणून दिली आणि पूर्ण केली. बस यापुढे यावर नक्की काहीतरी वेगवेगळे लिहित राहेन. माझ्या ब्लोगला जरूर भेट द्या व लेखनाबद्दल प्रतिक्रिया जरूर कळवा. शेवटी एक महिला म्हणून प्रत्येक महिलेसाठी समाजातल्या प्रत्येकाला मी सांगते,

'हो, महिलादिन आनंदीच असावा हि माझी मागणी आहे'

- काजल नाईक